Monday, 9 September 2019

अवचित कधीतरी


फार काही अपेक्षा नाहीये माझी
पण एखादा पाऊस होऊन ये ना कधीतरी..
कदाचित तेव्हा तुलाही कळेल,
'आभाळ दाटून येणं' म्हणजे काय असतं ते!!..
तुलाही असह्य होईल तो ताण..,
नि मग मनसोक्त बरसताना
अलगद होणा-या त्या रितेपणाचाही
मनस्वी आनंद घेशील तू..
माझं रडणंही निव्वळ व्यर्थ नसतं, हे,
कदाचित समजेल तुला...

फारसा हट्ट नाहीच्चे मुळी माझा,
तुझ्या पावसातला एख्खादा जरी थेंब
माझ्या गालावर येऊन पडला ना,
तरी चिंब होऊन जाईन मी..
हां, आता नेहमीसारख्याच तेव्हाही ओलावतील माझ्या पापण्या,
कदाचित!!..,
आणि अगदीच न राहवून एख्खादा टिपूसही ओघळेल
माझ्या काजळकड्यावरून..
पण तो जेव्हा तुझ्या थेंबाला येऊन मिळेल ना..,
तुलाही जाणवेल त्यातली स्निग्धता.., कदाचित!!...

तू पाऊस होऊन जेव्हा मातीत मिसळशील ना
तुझ्या ओल्या स्पर्शाने माझ्यासारखीच तीही शहारून जाईल बघ..
नि त्यावेळी तिच्या दरवळीचे ते मुग्ध धुमारे..
तेच कदाचित सांगतील तुला, माझं खरंच कित्ती प्रेम आहे तुझ्यावर!!..
शब्दाविना सांगण्याची नि अर्थावाचून समजून घेण्यातली
जी गंमत असते ना, तीही कळेल बघ तुला...
खरंच येशील का रे असा एखादा पाऊस होऊन अवचित कधीतरी?...

- चारुश्री वझे

Thursday, 30 May 2019

माझा वेळ

सहसा वेळ 'मिळतो' मला
पण आज मला वेळ 'भेटला' !!...
म्हणाला, "hey, काय म्हणतेस, कशीयेस?"..
मला थोडं विचित्रच वाटलं..
मी पाहतच राहिले त्याच्याकडे
माझ्या 'वैचित्र्यपूर्ण' नजरेने..
तसा एकदम माझ्या जवळ आला..
आणि बाजुलाच बसला.. खेटून!!..
मग मीही घुश्शातच विचारलं,
"काय काम आहे?"..
काहीसं मिष्किल हसत तो म्हणाला,
"विशेष काही नाही.. आज मी निवांतंय..
तूही आरामशीरेस.. म्हटलं यावं तुझ्यापाशी..,
बसावं तुझ्याशेजारी.., बोलावं तुझ्याशी..
.. ए, गप्पा मारुयात का आपण?..
थोडं तुझं - थोडं माझं share करु..
what say?"...
मी बधिरल्यासारखी पाहतंच राहिले त्याच्याकडे..
एकटक.. कुठलीच प्रतिक्रिया न देता..
मग तोच बोलता झाला-
''आपण किती एकमेकांसोबत असतो, नाई!!..
मात्र जगतो किती एकमेकांसाठी माहित नाही..
पण असतो मात्र एकमेकांसोबत.. कायम..
कधी माझ्यामागून तू पळत येतेस..
कधी माझ्यासोबतंच धावतेस..
तर कधी accelerator इतका वाढवतेस,
की काहीच्च्या काही पुढे निघून जातेस यार!!..
मग मीच कसाबसा गाठतो तुला..
करकच्च धरून सावरतो तुझा आवेग..
बदल्यात 'thank you' म्हणण्याचीही तसदी घेत नाहीस तू..
अर्थात्, दोस्तीत 'no sorry - no thanks', असंच असतं म्हणा !..
.. पण..
आपण आहोत का गं एकमेकांचे मित्र?"..
- असं म्हणून तो थांबला..
आणि मी पुन्हा तशीच पाहत राहिले त्याच्याकडे.. एकटक..
..
आज मला पहिल्यांदाच जाणवलं,
'माझा वेळ' हा खरंच कित्ती माझाय!!..
एरव्ही, वेळ मिळाल्यावर आनंद होतो..
आज, वेळ भेटल्यावर आश्वस्त वाटलं..
बहुधा, आमच्यात मैत्री होऊ लागलीये!!...
...

- श्री उवाच

Sunday, 3 March 2019

..
कारण,
खूप बोलायचं होतं..
बोलण्यासारखंही खूप काही होतं..
शब्द तर अक्षरशः धुमाकूळ घालत होते..
पण आश्चर्य म्हणजे तू समोर आलास
तरी, एकही शब्द बाहेर पडला नाही तोंडून..
दातात अडकले की लाळेवाटे गिळले गेले,
देवंच जाणे..
.. हां, किंवा संपावर गेले असावेत बहुधा..
आपल्यातला संवादच मान्य नसावा त्यांना..
तू गेलास निघून.
बरंच काही बोलून.. बरचसं न बोलताच..
मीही परतले माघारी.
मग मात्र इतके भसाभसा बाहेर पडले ना शब्द..
..
पुन्हा एक कविता उमटली कागदावर..
विनाकारण
..

- श्री उवाच


Tuesday, 13 November 2018

कविता

कधीकाळी आपण
एक कविता रचलेली..,
आठवतंय तुला?..
काही शब्द तू गुंफलेलेस..,
काहींना मीच गुंतवलेलं..
'छान चालीत म्हणायची हं!!'..
दोघांनीही पक्क ठरवलेलं.
वचनच दिलेलं जणु एकमेकांना..
आणि अचानक तू हरवलास;
नि मीही अबोल झाले..
..
पण तुला माहित्येय,
ही कविता कित्ती खोडकर आहे ते!..
'तुम्ही नाही म्हणणार ना?..,
जा, गेलात उडत..
मीच गुणगुणेन स्वतःला'..,
हे असं म्हणत थुईथुई नाचत येते
डोळ्यांतून ओठांपर्यंत..
..ज्या आड सारेच शब्द पार दडून गेले;
नि अर्थ मौनातच गारद झाले..
मग थबकन् खाली पडते
तळहाताच्या रेषांवर..,
जिथे तू हरवलास आणि
माझं बोलणंही थांबलं..
..
पण कविता मात्र अजूनही गुणगुणत राहते..
खट्याळ कुठली!..

- चारुश्री वझे
( श्री उवाच )

Monday, 10 September 2018

मैत्र


   (उजवीकडून) आजोबा आणि डिंगोरकर आजोबा (ज्येष्ठ पखवाजवादक). दोघेही वयवर्षे ८४. नि त्यांच्यातलं ६० वर्षांचं अतिशय भावपूर्ण मैत्र. ख-या अर्थाने एकमेकांचे सुहृद.. रेल्वेत आर्टिस्ट कन्सेशन व तत्सम कामांनिमित्त एकमेकांशी झालेल्या ओळखीचं दोघांच्याही सांगितिक व्यासंगाने पुढे मैत्रीत रूपांतर झालं. मुरांबा जसा दिवसागणिक अधिकाधिक मुरत जातो, तशी आजमितीस त्यांच्यातली ही ६० वर्षांची मैत्री विश्वास, आदर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयीची आपुलकी, या संमिश्र पाकात घोळलेली आहे. आणि वयोपरत्वे तिच्यातल्या माधुर्याला हळवेपणाचीही किनार लाभली आहे..
   मी लहानपणापासून डिंगोरकर आजोबांना पाहत आलेय. आमच्या संस्थेतंही (आयोजन संगीत सभा) एकदा त्यांनी पखवाजवादन सादर केलेलं. फारच लहान होते मी तेव्हा. पहिल्याच रांगेत बसलेले. विशेष काही कळलं नव्हतं; पण जाम भारी वाटलेलं.. आयोजनच्या, काही अपवाद वगळता, प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. हळुहळु वयोपरत्वे त्यांचं येणं कमी होत गेलं. (आताशा आयोजनचेही कार्यक्रम होत नाहीत.) परंतु, ते डोंबिवलीत राहात असल्याने तिथल्या शक्य तेवढ्या कार्यक्रमांमध्ये ते अजूनही आपली हजेरी लावतात..
   या ७ सप्टेंबरला (शुक्रवारी) कै.पं.सदाशिव पवार (बाबांचे तबलावादनातील गुरू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सदाशिव अॅकेडमीतर्फे बाबांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. अर्थातच डिंगोरकर आजोबाही तिथे आलेले. बाबांचा सत्कार त्यांच्याच हस्ते झाला. कितीतरी वर्षांनी त्यांची-बाबांची भेट झाली. दरम्यानच्या काळात आज्जीच्या निधनाचं त्यांना कळल्यावर आजोबांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांना झालेली. परंतु आमच्या नवीन घराचा पत्ता त्यांच्याकडे नव्हता.. कार्यक्रमात ब-याच वर्षांनी बाबांशी भेट झाल्यावर प्रथम त्यांनी आमचा पत्ता बाबांकडून एका कागदावर लिहून घेतला. आणि काल ते आजोबांना भेटायलाही आले..
   .. आल्या-आल्या आधी आजोबांची चौकशी. मग आजोबा खोलीबाहेर येताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. मग निवांत बसले. एकमेकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.. मी आणि आईही तिथेच होतो. आमचीही छान विचारपूस केली त्यांनी. मला खाऊही दिला.. मग बोलता-बोलता म्हणाले- "मध्यंतरी पाटलांकडून (पाटील आजोबा) वहिनींच्या निधनाचं कळलं.. त्या माऊलीच्या हातचं अन्न जेवलोय मी. हे ऐकून धक्काच बसला.. कधी दादांना भेटतोयसं झालं. पण तुमचा नवा पत्ता नव्हता माझ्याजवळ. मग परवा कार्यक्रमात आधी पत्ता लिहून घेतला एका कागदावर शेखरकडून. त्या दिवशी रात्री झोप नाही मला. दादांना भेटण्याची इतकी इच्छा झाली म्हणून सांगतो.. आमचं नातंच वेगळंय.. ते इतकं प्रेमाचं आहे ना, की.."- तोवर त्यांना इतकं भरून आलं की, त्यांचे सद्गतीत अश्रूच पुढलं बरंच काही सांगून गेले.. मघाशी म्हटल्याप्रमाणे दोघांच्याही मैत्रीला आता एक हळवीशी किनार लाभली आहे..
   .. सोशल मिडियावरल्या आभासी गप्पा नि एकूणच, नात्यांच्याही आभासी जगात या दोन सुहृदांच्या भावोत्कट मैत्रीची मी काल साक्षीदार झाले. नि माझीही मैत्रीची व्याख्या ब-यांच अंशी समृद्ध झाली.. कदाचित काल माणूस म्हणूनही मी मला नव्याने उमजले असावे..
  
  

Thursday, 26 July 2018

अवचित कधीतरी...


अवचित कधीतरी 
चहा छान जमून येतो..
नेमकं तेव्हाच रेडिओवर 
आवडीचं गाणं लागलेलं असतं..
खिडकीबाहेर आणि मनाआतही
संतत धारा बरसू लागतात..,
नि हवेची मंदशी झुळुकही
आणिक सुखावह वाटते त्यावेळी..
..
अवचित कधीतरी 
एकांतही असा हवाहवासा वाटतो..
...
 (1)

अवचित कधीतरी
तो थेंब होऊन ओघळतो
तिच्या खिडकीच्या गजांवरून..
अवचित कधीतरी
ती ही गंध होऊन दरवळते
त्याच्या अंगणातल्या ओल्या मातीतून..
..
अवचित कधीतरी
पावसालाही प्रेमात पडावसं वाटतं..
...

(2)
अवचित कधीतरी 
पाऊस असा काही बरसतो की,
सारं मळभ दूर होऊन जातं..
..
निरभ्र आकाश - नितळ झरा
शहारलेली हिरवळ - धुंद वारा..
..
अवचित कधीतरी 
नभीचं इंद्रधनु 
हळुच मनःपटलावरही उमटतं..
...

(3)
अवचित कधीतरी
ती पावसात भिजते..
चिंब..
..
अवचित कधीतरी
पापण्याही ओलावतात मग..
...

(4)
अवचित कधीतरी
आठवण येते..,
बराच वेळ रेंगाळते..
नकळत विरूनही जाते..
..
अवचित कधीतरी 
क्षणही काहीक्षण विसावतो..
...

(5)
अवचित कधीतरी 
तो भेटतो,
बोलतो,
हसतो, छानसा खळखळून..
..
अवचित कधीतरी
खर्चाच्या वहीत 'जमा' अशी नोंद झालेली असते..
...

(6)
अवचित कधीतरी
ती भेटते, 
बोलते,
हसते, छानशी खळखळून..
..
अवचित कधीतरी
उन्हालाही सावलीचा स्पर्श सुखावतो..
...

(7)
अवचित कधीतरी
शब्द मिळतात,
अर्थ सापडतात..,
कविताही सुचून जाते..
..
अवचित कधीतरी
मी ही व्यक्त होते,,
...

(8)
अवचित कधीतरी
आपसूक मागे सुटलेले बंध
अचानक समोर येतात..
आपसूकच मग पुन्हा जुळू लागतात..
..
अवचित कधीतरी 
आयुष्यंही नव्याने उलगडतं..
...
(9)
अवचित कधीतरी
मौनाची भाषा कळू लागते..
एकांत हळुहळु बोलू लागतो मग..
शांततेचंही सूक्ष्म संगीत ऐकू येऊ लागतं..
...
अवचित कधीतरी
मी माझ्यापाशी येते..
मी आणि माझी भेट हाते..
...
(10)

- 'श्री' उवाच

Tuesday, 3 July 2018

पाऊस असा रिमझिमतो...

कधी-कधी काहीतरी चुकतंयसं वाटतं.. निसटून चाल्लयसंही वाटतं.. पण ते मुद्दाम धरून ठेवावं असंही वाटत नाही.. कधी-कधी वाटतंही ते निसटू नये हातून म्हणून😁.. पण ब-याचदा 'Let it go'वालं फिलिंगच जास्त असतं..
.. पाऊस पडत असतानाही कधी-कधी काहीच घडत नाही. ना भरून येत, ना दाटून येत, ना गहिवरून ना उचंबळून येत.. कधी-कधी ही वरवरचीच शांतता असते. आतला कल्लोळ दडून बसलेला असतो कुठेतरी; किंवा जाणिवपूर्वक दडपून टाकलेलाही असतो.. तर कधी-कधी खरोखरंच शांत-स्तब्ध नजरेने आपण पाऊस पाहतो.. किल्मिषांचं जाळं नाही, नात्यातल्या उणी-दुणी नाहीत, उणिवांचा कुठलाच हिशेब नाही, आणि या अशा आठवांची कुठलीच सर नाही.. फक्त पाऊस पाहणं.. अशावेळी अगदीच नकळत हलकसं स्मितंही उमटतं गालांवर.. ते Candid clickने टिपून घ्यावसंही वाटत नाही तेव्हा आपल्याला.. कारण कुणीच नको असतं सोबत.. केवळ पाऊस आणि आपण.. त्याची ती रिमझिम बरसात आणि ती निमिषार्धात मनात साठवणा-या आपल्या पापण्यांची उघडझाप..
.. पाऊस अनुभवणं म्हणजे हेच असतं का?..  

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...