Sunday, 2 April 2017

असंच काहीसं .., सुचलेलं...

नमस्कार मंडळी! सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. (कालचा ‘जागतिक मूर्ख दिन’ सर्वांनी साजरा केला असणारच!!😆😆 त्याच्याही ‘Belated शुभेच्छा’..!)
तर मंडळी, ब-याचदा आपल्याला असंच काहीतरी सुचून जातं. उग्गाचच्या उगाच..; म्हणजे हे उगाचच आहे, असं आपल्यालाच पहिले वाटतं. पण जसजसं आपण ते आजमावून पाहू लागतो ना.., ब-याचदा काडीचंही तथ्य नसतं त्यात .. पण..; कधीतरी-कुठेतरी एखाद्या वळणावर अचानकपणे त्यातला एखादा इंटरेस्टींग फॅक्टर अनाहूतासारखा भेटतो. .. आणि मग.., मग काय! कागद-पेन आणि आपण अशा ‘श्रेष्ठत्रयींचा’ .. (आपणही?) .. (म्हणायला काय जातयं?!) .. एकमेकांसोबतचा संसार सुरु होतो. आणि त्यातून जे फलित होतं, ते म्हणजे हे शीर्षक. अर्थात् ‘असंच काहीसं .., सुचलेलं...’

... आज्जी गेल्यापासून आजोबा काहीसे एकाकी झाल्येत. आणि आताशा त्यांना हे एकाकीपण अधिकच जाणवायला लागलंय.. ;पण कधी-कधी मला गंमतच वाटते. म्हणजे गंमत अशी की, मी जे आज्जी-आजोबांना बघितलंय.., ते फारच तटस्थपणे वागायचे एकमेकांशी. कदाचित माझ्या दोन पिढ्यां-अगोदरचं हे नात असल्याने मला तसं वाटत असावं की काय? माहित नाही... पण हल्ली नकळतपणे आज्जीची आठवण येऊन आजोबांच हळवं होणं... एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्याला केवळ एका छानश्या सोबतीची गरज असते, नाही! .. मग ती सोबत कधी मनमुराद हसवणारी असेल, कधी आपली स्ट्रेन्थ वाढवणारी असेल, कधी सकारात्मकता निर्माण करणारी असेल ..
.. नि अचानक माझ्या डोळ्यांसमोर आला तो ‘लॉस्ट अॅण्ड फाऊण्ड’चा ट्रेलर.., खास करून ती शेवटची ओळ.., ‘खरंच, हवं असतं कुणीतरी’...

... कुणीतरी हवं असतं आपल्याला...
भांड-भांड-भांडायला..,
भरभरून बोलायला...
हसताना टाळी द्यायला;
नि कधी दादागिरीने टपलीत मारणारं..,
हवं असतं कुणीतरी...

फसलेल्या पदार्थावर
आधी नाक मुरडणारं..,
पण त्याच्या कहाण्या मात्र
अगदी मिटक्या मारून सांगणारं..,
हवं असतं कुणीतरी...

वाफाळलेल्या चहासोबत
वायफळ गप्पा मारायला..,
नि सीसीडीतल्या कॉफीचा बहाणा करून
‘मन की बात’ बयॉं करायला.., समोर ..,
हवं असतं कुणीतरी...

घसरून पडल्यावर आधी पोटभर फिदिफिदी हसून
मग उचलायला येणारं..,
नि जखम पाहता आपसूकच वटारलेल्या डोळ्यांत
‘अरेsssssब्बापरे!!!’...
तरीही, ‘हात्तीच्या!!!.. एवढीश्शीच्चे की!!.. होईल बरी लवकर’..;
असं फुशारक्या मारणारं..,
हवं असतं कुणीतरी...

.. अश्रू पाहणारे तर अनेक असतात..,
ते जाणणारं हवं असतं कुणीतरी...

कुठलाही आडपडदा न ठेवता खुलेआम व्यक्त होताना..;
तर कधी अबोलपणेच संवाद साधणारं..,
हवं असतं कुणीतरी...

कुणीतरी हवं असतं..,
या ना त्या असंख्य कारणांसाठी...
आपल्यानंतर कुणी असेल का आठवण काढणारं?..,
अशा बिनभरवशी प्रश्नापेक्षा
आपल्याला छानशी सोबत आहे..,
या शाश्वत उत्तरासाठीच..,
हवं असतं कुणीतरी..

खरंच हवं असतं कुणीतरी...

3 comments:

  1. खूप छान,
    खरंच...! काव्य आस्वाद !

    ReplyDelete
  2. खूप छान,
    खरंच...! काव्य आस्वाद !

    ReplyDelete
  3. अगदी खर आहे आणि जस जस वय वाढते तशी हि गरज आणखी वाढतच जाते

    ReplyDelete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...