Thursday, 30 March 2017

पै-पैशाची गोष्ट- एक दीर्घांक


पडदा उघडतो. एक स्त्री विंगेतून प्रवेश करते. आणि रंगमंचाच्या मधोमध असलेल्या तुळशी वृंदावनापाशी येते. तोवर तिच्यावर केंद्रीत झालेला प्रकाशझोत पूर्णतः प्रखर होतो... पाचवारी पातळ, गळ्यातील काळ्यामण्यांची पोत नि लटकता चष्मा, कपाळावरचं छोटस्सं गोल-गोल कुंकू नि डोक्यावरचे पिकलेले केस, गालावरचं मंदसं स्मित नि काहीसं कुबड असलेली ती स्त्री साधारण ६०-६५ वर्षांची गृहिणी व प्रेमळ आजी असल्याचा पहिला अंदाज प्रेक्षक येथे बांधतो. तिच्या हातातील उद्बत्ती, एकंदर प्रकाशयोजना आणि वातावरण निर्मिती करणारं पार्श्वसंगीत या गोष्टी दीर्घांकातील सायंकाळ दर्शवितात. तुळशीला ओवाळत जसजशी ही आजी पुढे येते तसतशी रंगमंचवरील प्रत्येक वस्तू दृश्यमान होते. उजव्या बाजूला कपाट व त्यावरची तस्बीर, मधोमध- तुळशी वृंदावनाच्या पुढे एक सोफा व त्याच्यापुढील टेबल आणि डाव्या बाजूला झाकलेली एक वस्तू. (त्या वस्तूतच पुढचं नाटक दडलेलं आहे.) अखेर सारा रंगमंच सायंकाळच्या वातावरणासह प्रेक्षकांसमोर सज्ज होतो. (या सगळ्यात दीड-दोन मिनिटे निघून जातात.) आणि आजीचं स्वगत सुरु होतं. अगदी सहजगत्या...
‘तालीम’ या नाट्यसंस्थेद्वारे साकारलेला आणि डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या कथेवर आधरीत पै पैशाची गोष्ट हा एकपात्री दीर्घांक असून ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे या प्रमुख भूमिकेत आहे. याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन विपुल महागांवकर यांनी केले आहे.  
... आजीचं अनौपचारिक स्वगत सुरु होतं. जान्हवी- तिचं नाव. (कुणाच्यातरी संदर्भातून ती स्वतःच्या नावाचा उल्लेख करते.) बोलता-बोलता सांगून जावं तशी ही ‘जान्हवी आजी’ तिच्या कुटुंबियांची जुजबी ओळख प्रेक्षकांना करुन देते. आणि एक संदर्भ घेऊन डाव्या बाजूच्या झाकलेल्या वस्तुजवळ जाते. व प्रेक्षकांसमोर ती उघड करते. तोच क्षण या दीर्घांकाची ख-या अर्थाने नांदी असल्याचे म्हणावयास काही हरकत नाही.
ती एक ट्रंक आहे. त्यातील वस्तू अनेकविध अदृश्य पात्रांच्या व्यक्तिरेखेसह बाहेर येतात. त्या वस्तुंमागे कुणाच्या ना कुणाच्यातरी आठवणींची नाळ जोडली आहे. त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर पात्रांचाही मग त्यात संदर्भ येतो. हा संदर्भ जान्हवी आजीच्या बोलण्यातून प्रेक्षकांना तत्काळ कळतो. प्रत्येकाची साधारण व्यक्तिरेखा ही त्यांच्या बोलण्या-चालण्याच्या धाटणीनुसार प्रेक्षकांसमोर उभी राहते. ‘जान्हवी आजी’ अर्थात इला भाटे यांनी या विविध व्यक्तिरेखा वकुबीने सादर केल्या आहेत. ‘जान्हवी’ या प्रमुख पात्राव्यतिरिक्त इलाताईंनी जवळपास नऊ-दहा व्यक्तिछटा आपल्या अभिनयातून जीवंत केल्या आहेत.
त्या ट्रंकेतील वस्तुंचा त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी व या दीर्घांकानुरुप असलेल्या पै-पैशाच्या आर्थिक गणितांशी आपसूकच संबंध येतो. जान्हवी आजी, तिची आई, जान्हवी आजीची मुलं-नातवंड अशा या चार पिढ्या, त्यांतले परस्पर बंध व त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि मुख्य म्हणजे या पिढ्यांतील आर्थिक तफावत ही प्रत्येक वस्तुगणिक जान्हवी आजीच्या स्वगतातून आपल्यासमोर येते. इलाताईंचा रंगमंचावरील सहज वावर व सकस अभिनय यांमुळे जान्हवी आजी व तिच्या सभोवतालच्या नात्यांतील कंगोरे प्रेक्षकांमोर अत्यंत तरलतेने उलगडतात. या कंगो-यांची गुंफण जरी प्रेमभावाने विणली गेली असली तरी त्यातील महत्वाचा धागा म्हणजे नात्याची आर्थिक बाजू! जी कुठेतरी जान्हवी आजीला भेडसावते. त्यामुळे झालेली तिची काहीशी चलबिचल मनःस्थिती सबंध दीर्घांकात व्यापलेली असून प्रेक्षकाला ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
पन्नास हजारात परतीच्या तिकीटासह होणारा परदेशी विमान प्रवास, १ हजार १२५ रुपयांत महागातील महाग साडी, ५० रुपयांत भारतीने (आजीच्या मुलीने) तिच्या मैत्रीणींना दिलेली ‘आइस्क्रीम पार्टी’ आणि फाईव्हस्टार हॉटेलमध्ये कुटुंबातील सात-आठ सदस्यांच्या जेवणाचं आलेलं बाराशे रुपये इतकं बिल या आर्थिक तपशीलांवरुन दीर्घांकाचा काळ हा १९९०-९५ सालादरम्यानचा असलेला दिसतो. जागतिकीकरणानंतरचा हा कालखंड. त्यावेळी नव्याने उदयास आलेला उच्च मध्यम वर्ग. आणि त्यातील प्रस्थापित व नुकतीच प्रवेश केलेली कुटुंबं.  ज्या कुटुंबात जान्हवी आजीच्या आईच्या काळात महिन्याचा खर्च पन्नास आणे; तिथे स्वतः जान्हवी आजीच्या काळात तो खर्च पन्नास रुपयांवर पोहोचला होता. या दोन्ही पिढ्यांत क्रयवस्तुंच्या संकल्पना व गरजा जरी बदलल्या असल्या तरी तरी दोन्ही पिढ्या हिशेबांस पक्क्या! परंतु आजीनंतरच्या पिढीत हिशेब नाहीच. नुसता खर्चच! शिवाय त्यात ढब्बू, भोकाचं नाणं, चवली-पावली-पै-आणा ही चलने कालबाह्य झालेली. अशावेळी आपली मुलं-नातवंड कितीही नाती जपणारी, प्रेमभावाने सर्वांचं करणारी असली तरी बदललेली आर्थिक गणितं आणि त्यापेक्षाही अंगावर येणारी त्यातील तफावत- जिच्यामुळेच ‘जनरेशन गॅप’ ही संज्ञा बहुअंशी सार्थ ठरते- अशा अतीव सुखासीनतेच्या अनामिक भयाने आयुष्याच्या संध्याकाळी जान्हवी आजीचं रुखरुखलेलं, हळवं झालेलं मन अखेरपर्यंत पै-पैशाची गोष्ट करीत राहतं.    


Color Of The Sky

रुईया फिल्म सोसायटी’ (RFS) तर्फे ३१ जुलै व १ ऑगस्ट २०१४ या दोन दिवसांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मला सर्वात जास्त आवडलेल्या ‘Color Of The Sky’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाविषयी...
‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’... काहीवेळा शब्दातूनही जेव्हा एखादी गोष्ट सांगता येत नाही तेव्हा ती शब्दातीत असते. त्या मागच्या भावना फक्त समजून घ्यायच्या असतात. त्या गोष्टीतलं मर्म जाणून घ्यायचं असतं. पण त्यासाठी मुळात त्या गोष्टीचं प्रकटीकरण हे सहज-सुलभ असावं लागतं. आणि हेच वैशिष्ट्य आहे डॉ. बिजू यांच्या ‘Color Of The Sky’ या चित्रपटाचं.
 एक चोर... माणूस म्हणून चांगला.., पण परिस्थितीमुळे चोरी करण्यासाठी प्रवृत्त झालेला असा तो, चोरी करण्यासाठी म्हणून एका वृध्द शिल्पकाराच्या होडीत शिरतो.., त्या चोरामागील चांगल्या माणसाला हेरून तो शिल्पकार चक्क त्याला स्वतःच्या घरी घेऊन  जातो (इतक्या वर्षांच्या प्रमाणिक कलासाधनेतूनच त्याला ही सूक्ष्म नजर प्राप्त झाली, हेच बहुदा दिग्दर्शकाला सांगायचं असावं.).., आणि तेथूनच सुरु होतो, त्या चोराचा माणूस बनण्याचा प्रवास...
 यात चोराची व्यक्तीरेखा इंद्रजित याने; तर शिल्पकार नेदुमुडी वेणू यांनी साकारला आहे.
 एक बेट... त्याच्या किना-यालगतच असलेलं त्या वृद्धाचं छोटसं-टुमदार घर... घरा-आजुबाजुचा रम्य निसर्ग... आणि त्या घरातील तिघेजणं- एक प्रौढवयीन पुरुष, एक तरुण मुलगी- जी मुकी आहे आणि एक लहान मुलगा. या तिघांचे एकमेकांशी आणि त्या शिल्पकाराशी असलेले संबंध, त्यातली मजा-निरागसता ही प्रत्येकाने तो चित्रपट पाहूनच अनुभवावी.
 सुरुवातीला हे तिघेही घरी आलेल्या त्या चोराला स्वीकारत नाहीत. त्यालाही खरंतर तिथे राहायचं नसतं. पण अडचण असते ती दोन बेटांतील त्या समुद्राची! त्याला ना पोहोता येतं; नाही होडी चालवता येत. त्यातूनही आपल्याला त्या वृद्धाने त्याच्या घरी का आणलं, यामागचं कारण न समजल्याने त्या बिचा-याची चांगलीच पंचाईत होते. तो वृद्ध सो़डता कुणीच त्याच्याशी बोलत नाही, ना त्याला कुठलाच प्रतिसाद देत. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होते.... 
 पण हळुहळु हे चित्र बदलत जातं. ते कसं बदलतं हे प्रत्यक्षच पाहण्यासारखं आहे. पण तो माणूस म्हणून चांगला असल्याने सगळ्यांच्याच मनात त्याच्याविषयीची आस्था निर्माण होते. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादातून आणि त्या वृद्ध शिल्पकाराने कळत-नकळतपणे दिलेल्या शिकवणीतून त्या चोराला स्वतःतील माणूस समजतो. निसटून गेलेली स्वतःचीच चांगली प्रतिमा त्याला गवसते. आणि तो वृद्ध आपल्याला त्याच्या घरी का घेऊन आला, हेही त्याच्या लक्षात येतं. कुठलंही नातं नसताना निःस्वार्थीपणे केलेले संस्कार, दिलेलं प्रेम यामुळे तोही अखेर त्या घरातलाच एक अविभाज्य भाग बनतो... 
 चित्रपट मल्याळी असूनही त्यातील सूक्ष्म-नाजूक भावना प्रेक्षकांना अगदी थेट कळतात. याचं मुख्य कारण म्हणजे साधं-सोपं-सहज-सुंदर असं कथानक, कमीत-कमी संवाद आणि प्रत्येक व्यक्तीरेखेच्या हावभावावर दिलेला जास्तीत-जास्त भर. त्यामुळे सबटायटल्स वाचण्यात प्रेक्षक कंटाळून न जाता त्यांना चित्रपटातील निसर्गाच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचा छान आस्वाद घेता येतो.
 चित्रपटाचा शेवटही काहीसा साहित्यिक पण बोधपर आहे. तो मराठीतून काहीसा असा-
‘आकाश हे नेहमी एकाच रंगाचं नसतं. कधी ते निळेशार, कधी तांबूस, कधी पिवळंफटक, कधी पांढरंशुभ्र, कधी काळकुट्टं; तर कधी रंगमिश्रित असतं. आपलं आयुष्यही असच अनेकानेक रंगांनी बहरलेलं आहे. या रंगसंगतीचा आपण स्वतः किती आनंद घेतो आणि दुस-याला तो किती देतो, यावरच आपलं माणूसपण ठरतं.’
- 'Color Of The Sky'

काय चाल्लयं आयुष्यात?

नमस्कार मंडळी! सर्वांना नववर्षाच्या आणि एकूणच सुंदर आयुष्याच्या सुंदर शुभेच्छा!! आणि हो, माझ्या या आधीच्या ब्लॉगवर दिलेल्या सुंदर-सुंदर प्रतिक्रियांबाबत मनःपूर्वक धन्यवाद!
तर मंडळी, आयुष्यात शुभेच्छांसाठी सण-उत्सवादी निमित्तच लागतात, ही संकल्पनाच आता काहीच्या काही कालबाह्य ठरली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला केवळ भारतीय सण, मग त्यात पाश्चात्त्य सणांचा झालेला समावेश, मग जसजसा मध्यमवर्ग विस्तारत गेला तसतसा ‘वर्षाखेरा’सोबत ‘महिनाखेर’ही साजरा करणं, मग फोफावलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने सप्ताह-अंताच्या खास नियोजनाचा पायंडा घालणं ते आता दिवसाची सुरुवात-मध्य-शेवट व त्याचबरोबरीने अधला-मधला चहाचा वेळ, यांतलं काहीही आयुष्यात शुभेच्छा देण्यासाठी पुरून उरतं. प्रेषक-प्रतिला केवळ त्यांच्या देवाण-घेवाणीचा उत्साह असला की आयुष्य कसं अगदी शुभेच्छांनी ओसंडून वाहतं!😁😁
पण मंडळी, असं शुभेच्छादित आयुष्य असल्यावर ते प्रत्येकासाठीच ‘लय भारी’ असणार, हा समज मात्र अत्यंत चुकीचा. म्हणजे कसयं ना, आतापर्यंतच्या मी केलेल्या मर्यादित क्षेत्रफळातील मर्यादित लोकसंख्येच्या सर्वेक्षणातून जो अंतिम निष्कर्ष समोर आला आहे, त्यानुसार...😨😨😏... बापरे! हे फारच भयानक आहे!!😎 थोडक्यात ‘काय मग, काय चाल्लयं आयुष्यात?’, असं विचारल्यावर ज्या हटके प्रतिक्रिया मला आजवर मिळाल्या, त्यात माझा हा बिचारा प्रश्न हटकून तोंडावर आपटला.😆😆
तर मंडळी, त्यातील काही आत्यंतिक नमुनेदार अशा प्रतिक्रियांचे नमुने मी आपल्यामसोर पेश करते. कृपया गौर फर्माईये... (गझलांच्या शब्दांकित मैफलीचा प्रभाव, दुसरं काही नाही!😉)
‘काय मग, काय चाल्लयं आयुष्यात?’
-    - ‘सध्या कटींग मारतोय.’ (ते मलाही दिसतयं. दृष्टिकोन विस्तारण्याची गरज.😏 असो!)
-   -  ‘बस का भाई! आपला आशीर्वाद असल्यावर अजून काय हवं?’ (या केसमध्ये प्रश्नच न कळणे, हा मुलभूत लोच्या आहे.😌😝)
-   -  Had break-up… single life सुरुए... आणि enjoy करतेय.’ (No comments…🙊)
-    ‘आयुष्यात काय चाल्लयं?!.. मीच बंद पडलोय!!’ (या केसमध्ये हे विधान स्वघोषित विनोद ठरवून त्यावर माझ्या टाळीसाठी हात पुढे केला जातो.😌😅)
-    - ‘आयुष्यात काय चाल्लयं!! बोंब लागलीये, बोंब! झाला का इंटर्नलचा अभ्यास?’ (माझ्या निखळ प्रश्नावरील या उत्तराने मीही असंख्य ‘बोंबावळी’त सामील होते.😟)
-   -  ‘हाहा... चाल्लयं आयुष्य.. काय आता!’ (इथे मात्र मला जामच राग येतो...😡)
एका रुईय्येटने तर मलाच प्रतिप्रश्न केला, ‘अरेव्वा! एकदम आयुष्यात काय चाल्लयं वगैरे!!.. नाट्यवलयमध्ये होतीस की काय?’ ()
अर्थात हा प्रश्न मी अजून केजोंना विचारला नाहीये. त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी भन्नाट उत्तर मिळेल. आणि माझ्या या प्रश्नास ‘नव-संजीवन’ या प्रकारातलं काहीतरी प्राप्त होईल.😌😀.. एकदा तर ‘काय चाल्लयं आयुष्यात?’ यावर ‘फिलहाल तो फॉग चल रहा है|’, असंही अनपेक्षित उत्तर मिळालेलं.😵😵 
तर मंडळी मला मिळालेल्या- मिळत असलेल्या या प्रतिक्रिया. आता प्रतिक्षा आहे आपल्या प्रतिक्रियांची.. आणि त्याचबरोबर ‘Color of the sky आणि ‘पै-पैशाची गोष्ट- एक दीर्घांक’ हे माझे दोन ब्लॉगही मी लगोलगच पोस्ट करीत आहे. तेही जरुर वाचावेत. धन्यवाद!! 

Friday, 3 March 2017

'धक्का'तंत्र

नमस्कार मंडळी! सर्वांना मराठी राज्यभाषादिनाच्या, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक आणि 'Belated' शुभेच्छा. आणि हो, या आधीच्या ब्लॉगवरील सुंदर-सुंदर प्रतिक्रियांसाठी अगदी मनापासून धन्यवाद. BTW लीना, ब्लॉग पोस्ट करायला जरा उशीरच झाला. त्यामुळे.., माफी मागतेय म्हणून क्षमस्व! 😁😀😀 ( बहुदा यांस विनोद म्हणणं, हेच कदाचित विनोदी ठरेल, नाही!.. असो.)
तर मंडळी, आपल्या आजुबाजुला ब-याचदा अनपेक्षित गोष्टी घडतात. ज्याचा आपल्याला 'धक्का' बसतो. कारण 'धक्का' ही गोष्टच मुळात अनपेक्षित असणं अपेक्षित आहे. कारण तिथेच तिचं अस्तित्त्व असतं.., तिथेच ती वास्तव्य करते.., तिथेच तिचं.., असो!.., आणि बरंच काही..! (भा.पो) (कारण एवढच सुचलं. म्हणून विसरायच्या आत पटकन लिहून टाकलं!!😝) तर मंडळी कधी-कुणाला-कुठे-कशाप्रकारचा धक्का बसेल, काही सांगता येत नाही. म्हणजे 'स्वप्नांच्या पलीकडले', असं काही अस्तित्त्वात असेलच तर ते म्हणजे एकतर 'चित्रपट'; नाहीतर हे 'धक्के'...
... 'अहो वझे, आता मोठा शिशूवर्गही झाला. वार्षिक परीक्षाही संपली. तुमच्या चारुश्रीला अजूनही अक्षरज्ञान नाहीये. रडण्यापलीकडे दुसरं करतेच काय ती? तिची पाटीही ऋत्विजाच पूर्ण करते. माझं ऐका. तिचं वय तसंही कमीच्चे. एवढ्यात पहिलीत पाठविण्याची घाई करु नका. अजून एक वर्ष तिला पुन्हा एकदा मोठ्या शिशूतच बसवा',- गोरे बाईंनी त्यांच्या खास सडेतोड शैलीत सांगितलं. ( सांगितलं कसलं, सुनावलच असेल कदाचित! हंsss खवट्टं!! एवढं बदड-बदड-बदडायच्या. रडणार नाही, तर काय हर्षभराने नाचायला हवं होतं मी?!) मग काय? मातोश्री तशाही अतिहळव्या- 'अरे देवा, कसं होणार हिचं?' ( मला वाटतं, ह्या प्रश्नाची व्युत्पत्ती अंदाजे तेव्हाच झाली असावी. ज्याप्रमाणे प्रवाह बदलला, तरी नदी मात्र तिच असते; अगदी त्याचप्रमाणे प्रसंग बदलले, पण हा प्रश्न मात्र अजूनही आपलं अस्तित्त्व राखून आहे! असो.) आणि बाबांनी तर मनोधारणाच केलेली- ' काही हरकत नाही! पुन्हा एकदा तिला मोठ्या शिशूत बसवुयात. तसंही जरा लवकरच शाळेत घातलयं आपण तिला.'
एवढं सगळं माझ्या आजुबाजुला घडत होतं. मला मात्र याचा थांगपत्ताही नव्हता! माझ्यासाठी मोठ्या शिशुतून पहिलीत जाणं म्हणजे पाटी-पेन्सिलऐवजी वही-पेन्सिल वापरण्यातलं अप्रूप आणि 'चला, आता काही आपल्याला त्या गोरे बाईंचा मार मिळणार नाही', हा निरागस-निखळ आनंद!! त्यामुळे अज्ञानात सुख असतं, हे मी या बाबतीत तरी मान्य करीनच. कारण  या हर्षभरातच मी त्या दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीत 'अ' ते 'ज्ञ'पर्यंतची मुळाक्षरं-व्यंजने, बाराखडी सगळंच्या सगळं मोठमोठ्याने बडबडून लिहिलं. इतक्यांदा लिहिलं-इतक्यांदा लिहिलं की, आई-बाबांना.., 'धक्का'च बसला. आणि अर्थातच माझी रवानगी पहिलीत झाली!😊😊...
... नववीत असताना मी एक लेख लिहिलेला. नाव होतं- 'छंद व उद्दीष्ट- त्यातील आपली ओळख'. लेख-स्वरुपात लिहिण्याचा तो पहिलाच प्रयत्न. त्यामुळे अतिशय उत्साहाने तो मी काळे मॅडमना दाखविला. काळे मॅडम आमच्या कार्येकर क्लासमधल्या मराठी-संस्कृतच्या शिक्षिका. शीर्षक वाचताच त्या कौतुकाने- 'अरेव्वा! आता घरी गेल्यावर सविस्तर वाचून सांगते', असं म्हणाल्या. मीही आनंदाने मान डोलावली. मला वाटलेलं आता दुस-या दिवशी त्या माझं कौतुक करतील, काही सुधारणा असल्यास सांगतील; आणि विषय तिथेच संपेल. पण दुस-या दिवशी त्या वर्गात आल्या. त्यांचं मराठीचं लेक्चर होतं आमच्यावर. आल्या-आल्या त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ज्या काही सूचना होत्या, जिथे सुधारणा आवश्यक होती त्याची नोंदही त्यांनी लेखातच लाल पेनाने केलेली. तो लेखाचा कागद घेऊन मी जागेवर बसणार तितक्यात त्यांनी तो माझ्याकडून परत घेतला. आणि सबंध वर्गासमोर त्यांनी स्वतः तो लेख मोठ्याने वाचला. तासाभराचं त्यांचं लेक्चर. त्या तासाभरात एखाद्या कवितेचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे त्यांनी माझ्या लेखाचं विवेचन केलं. साहजिकच हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धक्काच होता. मला तर खांदे उडवून आम्हा मुलींच्या गणवेशाला नसलेली कॉलरही टाईट कराविशी वाटली!😊😊...
... कॉलेजला जेव्हा दादरवरून जायचं असतं, तेव्हा मधला टिळक ब्रीजखालचा रस्ता ओलांडावा लागतो. आपल्याकडे कुठल्याही ब्रीजखाली निर्वासितांची वस्ती ही हमखास असते. काहींना त्यांची कीव येते; काहींना त्यांचा राग येतो. मला हे दोन्हीही अधून-मधून किंवा कधी सलग  एकामागोमाग एक वाटतं. तर त्या टिळक ब्रीजखालीही अशी वस्ती साहजिकच आहे. त्यांच्या त्या घराला ना भिंत ना दरवाजा. छप्पर म्हणून काय तो टिळक ब्रीज! एखादी फाटकी कळकट्ट-मळकट्ट अंथरलेली चादर, त्याच्या बाजूला छोटीश्शी शेगडी ( त्यावर काय शिजत असेल, देवच जाणे!), त्यामागे असलेला आरसा-कंगवा, एका तान्ह्या बाळाच्या हातात असलेलं भांडं, जे ते नेहमी तोंडात धरून ठेवायचं ( कदाचित तेव्हा त्याचे दात येत असल्याने त्याच्या हिरड्या शिवशिवत असाव्यात.), अशी त्यांची संसारिक सामग्री आणि एकूणच संसार! कधी तिथे लहान मुलांच्या रडण्याचे-भांडण्याचे आवाज असतात. कधी तिथली मोठी मंडळी जोरजोराने एकमेकांना शिव्या घालत असतात. आणि या सगळ्यात वाहने-पादचा-यांची ये-जा मात्र अव्याहत सुरू असते. 'प्रायव्हसी' हा शब्दच या मंडळींच्या गावी नसेल, नाही!  तर असा हा टिळक ब्रीज आला की, माझ्या पावलांची गतीही वाढायची. झरझर चालून तो ओलांडल्यावर हुश्शं वाटायचं.
एकदा तिथूनच जात होते. नेहमीप्रमाणे झर्रर्रदिशी तो ब्रीज ओलांडण्याचं ठरवलं अन् तोच माझी नजर नेमकी तिथे घडत असलेल्या एका दृश्यावर पडली.., आणि स्थिरच झाली. घटना होती, 'त्या मंडळींचं फोटोशूट'! त्यांच्यातलं एक 'कपल' त्यांच्यातल्याच एका इसमाकडून मोबाईलवर फोटो काढून घेत होतं. कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, कधी एकमेकांकडे पाहून, कधी एका बाळाला मांडीवर बसवून; तर कधी त्यांच्यातल्याच साधारण चौदा-पंधरा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन त्यांचं जणु 'फॅमिली फोटोशूट'च चाल्लेलं. त्या फोटोशूची लोकेशन्स म्हणजे ब्रीजखालची पत्र्याची गाळावजा झोपडी, ब्रीजच्या पाय-या आणि त्या समोरचा इलेक्ट्रीक पोल. तो 'कॅमेरामन' जेव्हा 'स्माईल' असं म्हणायचा, तेव्हा तोही त्यांच्यासोबत हसायचा. त्यांचे एरव्हीचे विचकटलेले-त्रासलेले चेहरे त्यावेळी ओठांचा मोठ्ठा 'ई' करून मात्र फारच गोंडस दिसत होते. मीही नकळतच तिथे पाच-सात मिनिटं घुटमळले. एक 'धक्का'च होता तो माझ्यासाठी...
... तर असे बरेच धक्के. धक्क्यांची यादीच सांगायची झाली तर मला एखादं 'धक्का सदर'च लिहावं लागेल कदाचित. अर्थात प्रत्येकाची स्वतःची एक धक्का- यादी असतेच. नसेल तर कधीतरी खास वेळ काढून जरुर करून पाहा. ती यादी कधी खळखळून हसवेल, कधी अंतर्मुख करेल, कधी डोळ्यातून टचकन् पाणीही आणेल. पण राव, बहुत मजा आएगा! नक्कीच!!😊😊😊    

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...