Tuesday, 13 November 2018

कविता

कधीकाळी आपण
एक कविता रचलेली..,
आठवतंय तुला?..
काही शब्द तू गुंफलेलेस..,
काहींना मीच गुंतवलेलं..
'छान चालीत म्हणायची हं!!'..
दोघांनीही पक्क ठरवलेलं.
वचनच दिलेलं जणु एकमेकांना..
आणि अचानक तू हरवलास;
नि मीही अबोल झाले..
..
पण तुला माहित्येय,
ही कविता कित्ती खोडकर आहे ते!..
'तुम्ही नाही म्हणणार ना?..,
जा, गेलात उडत..
मीच गुणगुणेन स्वतःला'..,
हे असं म्हणत थुईथुई नाचत येते
डोळ्यांतून ओठांपर्यंत..
..ज्या आड सारेच शब्द पार दडून गेले;
नि अर्थ मौनातच गारद झाले..
मग थबकन् खाली पडते
तळहाताच्या रेषांवर..,
जिथे तू हरवलास आणि
माझं बोलणंही थांबलं..
..
पण कविता मात्र अजूनही गुणगुणत राहते..
खट्याळ कुठली!..

- चारुश्री वझे
( श्री उवाच )

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...